तू गप्प राहिलेलाच बरा.. सलमानच्या नव्या पोस्टवर भडकले नेटकरी, काही तासांतच विचार बदलल्याचा आरोप – Marathi News | Salman khan tells students to end protest trolled by netizens saying mathrubhumi will not be hit by doing this


अभिनेता सलमान खानने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं. त्यानंतर गुरुवारी आणखी एक पोस्ट लिहित त्याने विद्यार्थ्यांना आंदोलन संपवण्याचं आवाहन केलं. त्याने पुढे असंही लिहिलं की, नीट पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर कारवाई करतील, असा मला विश्वास आहे. सलमानने सोनम वांगचूक यांनाही उपोषण संपवण्याचं आवाहन केलं. गुरुवारच्या या पोस्टनंतर आता सलमानला नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहेत.

‘जर तू धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकत नसशील तर तोंड बंद ठेव’, असं एकाने लिहिलं. तर ‘लोकांना वाटलं होतं की हा वाघ आहे, पण तो उंदीर निघाला’, असा टोला दुसऱ्या युजरने लगावला आहे. ‘भाऊ.. तुझं हे ट्विट तुझ्या मागच्या तीन चित्रपटांपेक्षाही वाईट आहे’, असं आणखी एका युजरने लिहिलं आहे. ध्रुव राठीनेही सलमानच्या या पोस्टवर कमेंट करत त्याच्यावर टीका केली आहे. ‘अमित शाह यांनी तुझ्या चित्रपटावर बंदी घालण्याची धमकी दिली आहे का’, असा खोचक सवाल त्याने केला आहे. ‘सर्वांना माहित आहे की माननीय पंतप्रधानांचं संपूर्ण सरकार फक्त ब्लॅकमेल आणि खंडणीवर चालतं. काळजी करू नको, मोदी सरकार गेल्यानंतर तुला तुझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य परत मिळेल, याची खात्री भारतातील जनता करेल’, अशी टीका ध्रुवने केली आहे. ‘तुझ्या ट्युबलाइट या चित्रपटापेक्षाही वाईट ही पोस्ट लिहिली आहेत. त्यापेक्षा तू गप्प राहिलेलाच बरा’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. अशी पोस्ट लिहिल्याने तुझे चित्रपट हिट होणार नाहीत, असाही टोला काहींनी लगावला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सलमानची नवीन पोस्ट-

गुरुवारच्या पोस्टमध्ये सलमानने लिहिलंय, ‘विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींना आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो, त्यामुळे विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी कोणतीही काळजी करण्याचं काहीच कारण नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत सांगितलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, पेपरफुटीच्या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी कृपया आपापल्या घरी परत जावं. सोनम (वांगचूक).. आता पुरे झालं. हा विषय यापेक्षा जास्त वाढवू नका. गरज पडल्यास (गरज पडेल असं मला वाटत नाही) हा उत्साह दुसऱ्या एखाद्या प्रसंगासाठी राखून ठेवा. पण कृपया आता काहीतरी खाऊन घ्या. वाटल्यास, मी जेवण पाठवतो.’





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *