महायुतीत कोणत्या जागांसाठी वाद, विधानपरिषद निवडणुकीसाठी पडद्यामागे नेमकं काय चालू? फडणवीसांनी थेट सांगितलं! – Marathi News | Devendra fadnavis comment told how many seats have clash for vidhan parishad election


Mahayuti Seat Distribution : विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंत राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये जागावाटपादरम्यान रस्सीखेच सुरू आहे. आपल्याच पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळायला हव्यात, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. एकीकडे जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असताना दुसरीके महायुतीतील तिन्ही घटकपक्षांमधील जागावाटपाचे सूत्र समोर आले आहे. तर काही जागांसाठी अजूनही महायुतीमध्ये एकमत झालेले नाही. असे असले तरी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असून महायुतीतील बडे नेते एकमेकांशी चर्चा करत आहेत. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नेमकं कोणत्या जागांवरून तिढा अद्याप कायम आहे, याची अप्रत्यक्षपणे माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीने कोणकोणत्या जागांवर दावा केला

आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी हिंगोली, परभणीची जागा शिवसेना लढवण्याची शक्यता आहे. तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीकडून पुण्याच्या जागेवरही दावा केला जात आहे. राष्ट्रवादीनेच कोकण, हिंगोली-परभणीच्या जागेवरही दावा केल्याची माहिती मिळत आहे.

आम्ही एकत्र बसू, चर्चा करू

याच जागावाटपाच्या तिढ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेशी आमची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीसोबत पुण्याच्या जागेबाबत आमची चर्चा सुरू आहे. आम्ही एकत्र बसू. त्यावर मार्ग काढू. अद्याप मार्ग निघालेला नाही, आमची चर्चा सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले.

महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला काय?

दरम्यान, महायुतीमध्ये एकूण 17 जागांसाठीचा संभाव्य फॉर्म्यूला समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या निवडणुकीत भाजपाकडे 12 जागा असण्याची शक्यता आहे. शिंदे गट एकूण चार जागा लढवू शकतो. तर राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. कोणाला किती जागा मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. त्याआधी आगामी दिवसांत काय काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *