राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिजीत दिपके यांनी संसदवर मोर्चा काढला आहे. आंदोलक संसद भवनच्या जवळ पोहोचले आहेत. मात्र पोलिसांकडून या आंदोलनाला विरोध केला जात आहे. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या आंदोलनावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. अंधारे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे – अंधारे
सुषमा अंधारे यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर बोलताना म्हटले की, ‘दिल्लीतील आंदोलनाची बातमी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे. आंदोलकांचा प्रश्न चर्चेतून सोडवता आला असता. पण प्रश्न चर्चेच्या पातळीवर सोडवण्याऐवजी सोनम वांगचुक यांना ज्याप्रकारे उचलले त्यातून आंदोलन मोडून काढण्यावर जास्त भर दिल्याचे दिसत आहे. पांढऱ्या चादरी घेऊन सोनम वांगचुक यांना हटवण्याचा प्रयत्न झाला, आपल्याकडे पांढऱ्या सादरी कधी वापरल्या जातात? शेवटच्या क्षणी. लोकशाही शेवटचा घटका मोजत आहे. लोकशाहीचा मुडदा उचलायचा आहे अशा पद्धतीने पांढऱ्या चादरी वापरल्या गेल्या.’
विश्वगुरू झुरळांना घाबरतात…
पुढे बोलताना अंधारे यांनी म्हटले की, आज सुद्धा पाण्याचे फवारे, लाठीचार्जसाठी सरकार सज्ज आहे. जे लोक पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे असे म्हणतात ते आपल्याच देशातील नागरिकांशी चर्चा करायला घाबरतात. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही नंतरची गोष्ट पण तुम्ही चर्चा करायला घाबरत आहे. याचा अर्थ विश्वगुरू झुरळांना घाबरतात. हे फार चिंताजनक आहे, या देशात लोकशाही संपलेली आहे.
आम्ही दिपके यांच्या संपर्कात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावर बोलताना अंधारे यांनी सांगितले की, आम्ही सगळे सीजेपी सोबत आहोत,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वारंवार संपर्कात आहेत. अभिजीत दिपके, सोनम वांगचुक यांच्याबरोबरच 18 जणांशी आम्ही संपर्क साधला असून चर्चा केली आहे.