शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करत आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत चोरीचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज नागपुरात उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पठण केले. यावेळी संजय राऊत, चंद्रकांत खैरे, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी हजर होते. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामरक्षा येते का असा प्रश्न विचारला होता. यावर आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना उत्तर…
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी, ‘मला नाही म्हटलं तरी वाईट वाटतं. मंदिर उभं राहिलंय. पण मंदिराच्या रक्षणाचा लढा सुरू करावा लागतोय. या मंदिराच्या ट्रस्टींना धन्यवाद देतो. त्यांनी सहकार्य दिलं. आशीर्वाद दिले. सकाळी संजय राऊतांचा फोन आला. उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचं का? मी म्हटलं का? म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलंय उद्धव ठाकरेंनी राम रक्षा बोलून दाखवावी. मी त्यांच्या गावातच सांगतो, फडणवीस राम रक्षा म्हणणं तुमचं काम असलं तरी राम रक्षा करणं आमचं काम आहे. आम्ही राम रक्षक आहोत. मनात भाव नाही आणि राम रक्षा म्हणत आहेत. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. हे तुमचं आहे’ असं म्हणत फडणवीस यांना उत्तर दिले आहे.
भाजपच्या अंगात सैतान घुसलाय का?
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबतही भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, गेले 20 दिवस वांगचुक उपोषणाला बसले होते. त्यांची उचलबांगडी केली. अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले. चादरी टाकल्या आणि घेऊन गेले. दीपके तिकडे बसलाय. त्याच्या अंगावर शाई फेकली. मी रामाला विचारलं हे काय झालं. ज्या भाजपने तुझ्या नावाने मते मागितली त्या भाजपच्या अंगात सैतान घुसला काय. यांच्यातील माणुसकी गेली. पण सैताना कसा जागा झालाय. एवढे कसे पिसाटले.’