मुंबई : एसटी कामगार संघटनेचे नेते तथा वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांनी पुन्हा एकदा मनसेप्रमुख राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास पाठिंबा दिल्यावरुन सदावर्ते यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) काय ढेकळं कळतात का, असे म्हणत जहाल शब्दात टीका केली. तसेच, सोनम वांगचुक यांचं आंदोलना युवकांच्या भावनांशी खेळ असून आता सोनम वांगचुक (Sonam wangchuk) यांना हटवून राज ठाकरेंना उपोषणला बसवावं, असेही त्यांनी म्हटलं.
सोनम वांगचुक यांचं आंदोलन म्हणजे वैद्यकीय परीक्षेच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावनांच्या आधारावर इमोशनल ब्लॅकमेलिंग करत पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, देशात आणि राज्यात ते सुरू झालंय. विद्यार्थ्यांच्या भावनांचा आधार घेत दिल्लीत आंदोलन सुरु आहे, लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, हे भारतीय संविधानाला मानतात की नाही हा प्रश्न आहे, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावर टीका केलीय. मनोज जरांगेची प्रकृती खराब होत असताना उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते, आता दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली. मग सोनम वांगचूक यांना सांगायचं आहे का, ते संविधानापेक्षा मोठे आहेत. मरेपर्यंतचे उपोषण कोणालाही करता येत नाही, संविधान विरोधी हलकी का वाजवली जाते आहे, संविधानाविरोधी ढोकली का वाजवली जात आहे? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला. तसेच, भारताच्या संविधाननिर्मित सीबीआयवर सोनम वांगचुकला भरोसा नाही का? असेही ते म्हणाले.
राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?
नीट पेपरफुटीप्रकरणी सोनम वांगचुक आणि राज ठाकरेंना आता तपास अधिकारी करायचं का? ढोबळ भाषेत सांगायचं तर, राज ठाकरेंना ढेकळं कळतात का? अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. राज ठाकरे आता वाजंत्रीवाल्यासारखं आता हलकी वाजवणारे झाले आहेत का? त्यांना त्यांचे प्रश्न संपले आहेत का? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. पेपरफुटी प्रकरण गंभीर, मात्र यंत्रणांवर विश्वास ठेवायचा असतो. आता, मुंबईत मोर्चा काढला जाईल, राज ठाकरेला आता सोनम वांगचुकचा पुळका आलाय. आता राईट टू लाईफच्या अधिकाराने सोनम वांगचुकला बाजूनला करत राज ठाकरेंना उपोषणाला बसवावं. मात्र, बिना माल ओढता, असे म्हणत राज ठाकरेंवर गुणरत्न सदावर्तेंनी जहाल टीका केली.
अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंनी टीईटी पेपरच्या बाबतीत बोलायचं ना, म्हणजे जास्त प्रगल्भ वाटले असते. तुम्ही, छोट्या-मोठ्या प्रभागपुरते राहिले आहात. मनसेत त्यांचा पाठीराखा किंवा राज ठाकरेंच्या पार्टीत त्यांचा समर्थक कोणी आहे का नाही? कौटुंबिक पार्टीपर्यंत पक्ष गेल्यावर देखील ते काही करत नाहीत, असे म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरेंचा पोरगा म्हणाला, आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, मात्र अभिजित दिपकेला नाही. म्हणजे काय? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी विचारला. तसेच, लोकं याचाही अभ्यास करत असतात. शेंपूड पुसता येईना आणि राजकारण करायला निघाला का भाऊ? असं आमच्याकडे म्हणतात असे म्हणत सदावर्तेंनी अमित ठाकरेंवरही टीका केली.
हेही वाचा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला