Parth Pawar Meeting With Devendra Fadnavis: राज्याच्या राजकारणात विरोधी बाकावर विरोधक उरतात की नाही? असा सवाल राजकीय तज्ज्ञांना पडला आहे. राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा आहे. कालपरवा शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचवेळी दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते प्रफुल्ल पटेल हे सुद्धा वर्षांवर उपस्थित असल्याने चर्चांना ऊत आला. आता पार्थ पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकारणाला उकळी फुटली आहे. फडणवीसांसोबत पार्थ पवार यांनी कोणती चर्चा केली याची चर्चा सुरू आहे.
पार्थ पवार वर्षा बंगल्यावर
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीची पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना कल्पना नव्हती असे समोर आले होते. काल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत या वृत्ताचे खंडन केले. मतदारसंघातील कामानिमित्त मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्याचे आणि पक्षात संवाद असल्याचे तटकरे म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार पार्थ पवार आणि फडणवीस यांची भेट झाल्याचे कळते.
राज्यातील राजकीय घडामोडींचे वर्षा हे केंद्रबिंदु ठरले आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी महायुतीत घरोबा करण्याच्या चर्चांनी सध्या राजकारण व्यापलं आहे. दोन्ही पक्ष विलिनिकरणाच्याही चर्चा होत आहे. दोन्ही बाजूने या वृत्ताचे खंडन करण्यात येत असले तरी भेटीचा क्रम बरेच काही सांगून जातो. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याचा तपशील हाती आला नसला तरी त्याचवेळी पार्थ पवार आणि फडणवीस यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. दोन्ही पक्षांनी या चर्चांबाबत कानावर हात ठेवले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील एक मोठा गट हा सत्तेसोबत जाण्याचा मुद्दा रेटत असल्याचे म्हटले जात आहे. अर्थखात्याचा पेच एकदा सुटला तर कदाचित येत्या 15 दिवसात विरोधी बाकांवरील आमदारांचीच नाही तर खासदारांची संख्याही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील घडामोडींची साखळी पाहता काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जयंतराव पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर पार्थ पवारांची वर्षावरील वारी ही त्यातीलच एक कडी मानल्या जात आहे.