भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आता 19 जुलै रोजी रंगणार आहे. आता दोन्ही संघानी एक एक सामना जिंकल्यामुळे मालिकेत बरोबरीत आहे. पुढील सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत असणार आहे. आता हा शेवटचा सामना रोहित शर्मासाठी महत्त्वाचा असणार आहे. रोहित शर्माचा इंग्लंडविरुद्धचा पुढील सामना हा शेवटचा असू शकतो. आता याबाबत भारतीय संघाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी ही एक विधान केले आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, सितांशु कोटक यांना रोहित शर्माच्या भविष्याबद्दल आणि तो ज्या दबावाचा सामना करत आहे त्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, “मला नाही वाटत की रोहित शर्मासारख्या मोठ्या खेळाडूला कधी दबाव जाणवू शकेल. तो इतका मोठा आणि इतका चांगला खेळाडू आहे की तो असा दबाव हाताळू शकत नाही. होय, हे खरं आहे की तो गेल्या दोन डावांमध्ये धावा करू शकलेला नाही, पण मला वाटत नाही की त्यामुळे काही फरक पडतो. आजही तो एक मोठी खेळी खेळेल असे वाटत होते, पण क्रिकेटमध्ये हे सामान्य आहे.”
रोहित शर्मा धावा करण्यासाठी झगडत आहे, हे कोटक यांनी पूर्णपणे नाकारले. रविवारी लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम सामन्यात रोहित वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले, “कधीकधी फलंदाजांना एखाद्या दिवशी हवी असलेली लय मिळत नाही. लॉर्ड्सवर तुम्हाला रोहित शर्माकडून एक पूर्णपणे वेगळी खेळी पाहायला मिळू शकते. त्याचे वर्णन करण्यासाठी मी ‘झगडणे’ हा शब्द वापरणार नाही. कार्डिफच्या खेळपट्टीवर चेंडू असमान उसळत होता, ज्यामुळे त्याला हवेत नेहमी खेळले जाणारे फटके खेळणे कठीण झाले. रोहितला त्याच्या पसंतीच्या जागी चेंडू मिळत नव्हते.”
यावर्षी रोहित शर्माची कामगिरी खराब राहिली आहे. आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले असून त्याची सरासरी 30.12 आहे. या काळात तो केवळ 241 धावाच करू शकला आहे. इंग्लंड मालिकेपूर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही तो चांगली कामगिरी करू शकला नाही. यामुळे त्याची एकदिवसीय कारकीर्द धोक्यात आल्यासारखी वाटते.