गुलशन कुमार यांच्या हत्येच्या कटात सामिल होते नदीम सैफी? अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन – Marathi News | Anuradha paudwal break silence on gulshan kumar death was nadeem involved in conspiracy


टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांची 1997 मध्ये जेव्हा हत्या झाली, तेव्हा संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं. या प्रकरणाचा तपास जेव्हा सुरू झाला, तेव्हा संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांच्यापैकी नदीम सैफीचं नाव समोर आलं होतं. गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांपैकी एक नदीमसुद्धा होते, असं म्हटलं जात होतं. त्यानंतर काही दिवसांनी ते देश सोडून गेले. नदीम सैफीच गुलशन कुमार यांच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाईंड होता, असा दावा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीसुद्धा केला होता. या संपूर्ण वादावर आता ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत अनुराधा पौडवाल यांना गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. “गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणात नदीम यांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं होतं, असं समीर म्हणाले होते. नदीम यांचं गुलशन यांच्याशी कोणताच वादसुद्धा झाला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं. त्या प्रकरणाची त्यांचं काहीच देणं-घेणं नव्हतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या प्रकरणात नदीम सामिल होते का, किंवा हे सर्व दुर्दैवाने घडलं”, असा सवाल अनुराधा पौडवाल यांना करण्यात आला.

काय म्हणाल्या अनुराधा पौडवाल?

शुभांकर मिश्राच्या पॉडकास्ट मुलाखतीत यावर अनुराधा म्हणाल्या, “मला यातलं काहीच माहीत नाही. मी नकारात्मक गोष्टींमध्ये कधीच रस दाखवला नाही. जरी काही असलं तरी गुलशन कुमार यांनी कधीच माझ्यासोबत त्याबद्दल काहीच वक्तव्य केलं नव्हतं. त्यामुळे त्या वेळी काय घडलं होतं, हे मी आता सांगण्याच्या स्थितीत नाही. हे मी पूर्ण सत्य सांगत आहे. मी स्वत:ला कायम नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवलं आहे.”

उज्ज्वल निकम काय म्हणाले?

गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर नदीम अनेक वर्षे युकेमध्ये राहिले. त्यानंतर ते दुबईत वास्तव्यास आले. काही वर्षांपूर्वी नदीम यांनी भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत उज्ज्वल निकम म्हणाले होते, “त्यांनी माझ्याकडे परत येण्याचा प्रस्ताव दिला होता. मी म्हटलं.. नक्की परत या आणि खटल्याला सामोरं जा. परंतु त्यांना तसं करायचं नव्हतं. जेव्हा आम्ही त्यांना लंडनमधून सरेंडर करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला होता.”

या मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी गुलशन कुमार यांच्या हत्येमागे अनुराध पौडवाल आणि अलका याज्ञिक यांच्यावरून झालेल्या वादाचं कारण असल्याचं सांगितलं. “अनुराधा पौडवाल त्यांची (गुलशन कुमार) गायिका होती आणि अलका याज्ञिक या नदीम-श्रवण यांची गायिका होती. नदीम यांनीच त्यांच्या हत्येचा कट रचल्याचं पोलिसांना वाटत होतं. नदीम यांच्या आदेशावरूनच त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, असं पोलीस मानतात. हा कट दुबईत रचला गेला होता.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *