केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार का? CM फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला; मोठी उलथापालथ होणार? – Marathi News | Devendra fadnavis reaction on pm narendra modi cabinet reshuffle possiblitis after sanjay raut statement at nagpur


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील, तर महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदारी मिळेल, असा दावा संजय राऊतांनी केलाय. देवेंद्र फडणवीसांची केंद्रात वर्णी लागल्यास मुख्यमंत्रि‍पदी एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी, अशी इच्छा शिवसेनेचे नेते व्यक्त करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आता या चर्चेवर खुद्द मुख्यमंत्री  फडणवीसांनीच पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी परवाच दिल्लीला गेलो होतो, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रात जाण्याची चर्चा फेटाळून लावली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी केंद्रीत मंत्रिमंडळात जाण्याच्या चर्चेवर उपरोधिक भाष्य केलं. तर कर्जमाफीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘काल सभागृहात सांगितले. यापूर्वीच्या कर्जमाफीत लगतच्या कर्जमाफीच्या लोकांना समाविष्ट केलं नव्हतं. पहिल्यांदा आपण हा निर्णय घेतला की, मागची कर्जमाफी होती. जी महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्जमाफी होती, त्यात ज्यांना माफी मिळाली होती. परंतु ते आता डिफॉल्टमध्ये गेले आहेत. त्यांना आधी 50 हजारापर्यंत रिलीफ देणार होतो. परंतु सत्तारुढ पक्षाचा आग्रह होता की, त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. आपण ते मान्य केले. ही महाराष्ट्रातील इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे’. तर कर्जमाफीचं शरद पवारांनी स्वागत केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे आभार मानले.

विदर्भाच्या हवामानावर भाष्य करताना म्हटलं की, ‘विदर्भात पाऊस लांबला. साधारणपणे मधल्या दिवसांत पिकांना संरक्षणात्मक सिंचन दिल्यास अडचण येणार नाही. यावेळी अलनिनोमुळे पावसाची तुट राहणार आहे. दोन पावसांमध्ये अंतर राहील. यासाठी शेतकऱ्यांना सांगितलं आहे की, धूळ पेरणीवर अवलंबून न राहता, उशिरा पेरण्या करा. त्यांनी त्या केल्या आहेत. आता विहिरी, सिंचनाचा वापर करून शेतकरी पिके वाचवू शकतात’.

बोगस बियाणांवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘कमी गुणवत्ता असलेले बियाणे सोयाबीनचे बियाणे हे विशेषत: विदर्भात आढळलं आहे. त्याच्यावर तात्काळ कारवाई केली आहे. 5000 नमुने घेतले आहेत. त्यातील 300 नमुने फेल झालेत. त्यांच्यावर लायसन्स रद्द करणे ते फौजदारी कारवाया होतील’. मोशीजवळ इमारतीचे काही मजले अनधिकृत असल्याचे समोर आलेत, यावर फडणवीस म्हणाले, ‘या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्वात प्रथम तिथून लोक बाहेर काढणे. त्याला प्राधान्य दिलं आहे. लोकांना बाहेर काढण्याचं काम संपत आहे. त्यानंतर या प्रकरणी कारवाई केली जाईल’.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *