Last Updated:
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यातही टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. याचसोबत टीम इंडियाने ही सीरिजही गमावली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय टीम अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.
ब्रिस्टल : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यातही टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. भारताने दिलेल्या 159 रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 13.5 ओव्हरमध्ये फक्त एक विकेट गमावून पार केला. इंग्लंडकडून फिल सॉल्ट आणि कर्णधार हॅरी ब्रुक यांनी अर्धशतकं केली. सॉल्टने 42 बॉलमध्ये 9 फोर आणि एक सिक्सच्या मदतीने नाबाद 59 रनची खेळी केली. तर ब्रुकने 35 बॉलमध्ये 79 रन केले ज्यात 8 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. 159 रनचं आव्हान रोखण्यासाठी आल्यानंतर अर्शदीप सिंगने सुरूवातीलाच जॉस बटलरची विकेट घेतली, पण त्यानंतर फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रुकने भारताच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.
टीम इंडियाची बॅटिंग पुन्हा गडगडली
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 158 रन केले. कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 रनची खेळी केली. तर शिवम दुबेने 23 बॉलमध्ये 22 रन केले. याशिवाय कोणत्याच भारतीय बॅटरना मोठा स्कोअर करता आला नाही. वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे दोन्ही ओपनर पुन्हा एकदा अपयशी ठरले. वैभवने 15 आणि अभिषेकने 16 रनची खेळी केली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि जॉश टंग यांना 2-2 विकेट मिळाल्या, तर विल जॅक्स आणि आदिल रशीद यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
टीम इंडियाने सीरिज गमावली
चौथ्या टी-20 सामन्यातल्या या पराभवासोबतच टीम इंडियाने सीरिजही गमावली आहे. पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पुढच्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय टीमला पराभवाचा धक्का बसला. आता सीरिजचा शेवटचा सामना जिंकला तरीही भारतीय टीमला सीरिज जिंकता येणार नाही.
श्रेयसची पाटी अजून कोरीच
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआय आणि निवड समितीने सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी काढून घेऊन श्रेयस अय्यरकडे टीमचं नेतृत्व दिलं, पण त्यानंतर टीम इंडियाला एकही विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंड दौऱ्यात टीमचा 2-0 ने पराभव झाला, यानंतर भारताने इंग्लंडमध्येही 3 सामने गमावले. लागोपाठ 6 सामन्यांमध्ये एकही विजय न मिळवण्याची टीम इंडियाची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
आता लाज वाचवण्याचं आव्हान
सीरिज गमावलेली असल्यामुळे आता पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला लाज वाचवण्याचं आव्हान आहे. पाचव्या सामन्यात पराभव झाला तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिला टी-20 सामना जिंकायला टीम इंडियाला झिम्बाब्वे दौऱ्याची वाट पाहावी लागेल.
Mumbai,Maharashtra
