दिलजीत दोसांझचा ‘सतलज’ ओटीटीवरून का काढला? सरकारने सांगितलं मोठं कारण – Marathi News | Why diljit dosanjh satluj movie removed from ott zee5 who had problem with it government cites security reasons


अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या ‘सतलज’ या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या वादात कलाकारांपासून राजकारण्यांनीही उडी घेतली आहे. ‘सतलज’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता आणि सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची प्रतीक्षा करत होता. अखेर जेव्हा तीन वर्षांनंतर हा चित्रपट झी5 वर प्रदर्शित झाला, तेव्हा अचानक त्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आलं. आता पुढील आदेशापर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांना भारतात पाहता येणार नाही. यावर दिलजीत दोसांझसोबतच दिग्दर्शक हनी त्रेहान आणि चाहत्यांकडूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा चित्रपट का हटवला गेला, त्यात असं आहे तरी काय, असा प्रश्न विचारला जात आहे. यादरम्यान आता सरकार सुरक्षेच्या कारणास्तव चित्रपट हटवण्यात आल्याचा दावा करत आहे.

का काढून टाकला चित्रपट?

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेनं एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलंय की, हा आदेश सुरक्षेच्या कारणास्तव जारी करण्यात आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सना या मार्गदर्शक तत्त्वांचं जबाबदारीने पालन करण्यास सांगण्यात आलं आहे. अधिकाऱ्याने पुढे असंही सांगितलं की, हा चित्रपट ‘पंजाब 95’ या नावाने 2022 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी त्यात तब्बल 127 कट्स सुचवले होते. हे कट्स स्वीकारण्यास निर्मात्यांनी नकार दिला आणि त्यामुळे प्रदर्शन लांबणीवर गेलं.

चित्रपटात काय?

“त्यावेळी सुचवलेल्या कट्सवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. नंतर हा चित्रपट एका नवीन शीर्षकासह गुपचूप ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. ओटीटी प्लॅटफॉर्म सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत. जेव्हा हे प्रकरण सरकारच्या निदर्शनास आलं, तेव्हा त्यानी झी 5 ला तो चित्रपट काढून टाकण्यास सांगितलं”, असं अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. दिलजीतचा ‘सतलज’ हा चित्रपट मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालसा यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी 1984 ते 1994 दरम्यान पंजाबमध्ये हजारो अज्ञात व्यक्तींच्या बेपत्ता होण्याच्या आणि त्यांच्या कथित अंत्यसंस्कारांच्या प्रकरणाचा तपास केला होता. त्यांच्या तपासामुळे हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं होतं.

1995 मध्ये जसवंत सिंग खालरा यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह नदीत फेकून देण्यात आला होता. 2005 मध्ये पंजाब पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांना खालरा यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता चित्रपट अचानक ओटीटीवर काढल्यानंतर दिग्दर्शक हनी त्रेहान म्हणाले, “जर कोणी मला विचारलं की चित्रपटाबद्दल कोणाला अडचण होती, तर खरं सांगायचं तर मला माहीतच नाही. कोणतेही चेहरे, कोणतीही नावं पुढे आलेली नाहीत. जे काही घडलं ते तिसऱ्या पक्षांमार्फत किंवा वकिलांमार्फत घडलं. मी मनात कधीही कटुता बाळगली नाही. देश चालवणाऱ्या लोकांवर प्रचंड जबाबदारी असते. कधीकधी त्यांना असहाय्य वाटलं असेल. मी त्या लोकांचा आणि त्यांच्या पदांचा आदर करतो.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *