तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपासून थलपती विजय हे सतत चर्चेत आहेत. अशातच आता विजय आणि त्यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. राज्यातील तीन प्रमुख पक्षांनी म्हणजेच DMK, AIADMK आणि भाजपने मुख्यमंत्री विजय यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या वेळेत राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेत सत्ताधारी पक्षावर आमदारांची फोडाफोड केल्याचा आरोप केला. तसेच मुख्यमंत्री विजय यांच्यावर सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी नसलेल्या व्यक्तींना प्रवेश दिल्याचाही आरोप करण्यात आला.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर DMK नेते आर. एस. भारती यांनी म्हटले की, ‘विजय सरकार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असून आमदारांची खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. आम्ही राज्यपालांची प्रत्यक्ष भेट घेऊन तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या घोडेबाजार आणि सत्तेच्या गैरवापराबाबत माहिती दिली. जॉन आणि विष्णू रेड्डी या दोन व्यक्तींचा सरकारशी कोणताही अधिकृत संबंध नाही, मात्र ते मंत्र्यांपेक्षा जास्त प्रभावशाली दिसत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्वजण उच्चस्तरीय बैठकींना उपस्थित राहतात आणि अधिकाऱ्यांना आदेश देतात. त्यामुळे राज्यात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज आम्ही राज्यपालांची भेट घेऊन हे सर्व मुद्दे मांडले.’
मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यावर आमदार फोडण्याचा आरोप
काही दिवसांपूर्वी MDMK चे नेते वायको यांनीही आरोप केला होता की, मुख्यमंत्री विजय यांनी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी DMK च्या दोन आमदारांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन TVK मध्ये येण्याची ऑफर दिली. या आरोपाची DMK ने थेट राज्यपालांकडे तक्रार केली. या तक्रारीत विजय यांनी संबंधित आमदारांना राजीनामा देऊन जागा रिक्त केल्यास पोटनिवडणुकीत TVK कडून उमेदवारी आणि आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
भाजप आणि AIADMK चीही राज्यपालांकडे तक्रार
DMK प्रमाणेच AIADMK आणि भाजपनेही राज्यपालांची भेट घेऊन राज्यातील घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर घोडेबाजार तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत खासगी व्यक्तींना सहभागी करून घेतल्याचा आरोप केला आहे. भाजपने जॉन अरोकियासामी आणि विष्णू रेड्डी यांनी शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री विजय यांच्याविरोधात चौकशीची मागणी केली आहे.
जॉन आणि विष्णू हे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार, TVK चे स्पष्टीकरण
तामिळनाडूतील तीन महत्त्वाच्या पक्षांच्या आरोपांना TVK ने प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाने घोडेबाजाराचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले. तसेच जॉन आणि विष्णू रेड्डी हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर होते यावर बोलताना सांगितले की, त्यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते आता खासगी व्यक्ती नसून सरकारी यंत्रणेचाच भाग आहेत.