Last Updated:
Kalyna Murbad Railway: सध्या मुरबाड परिसरातील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी कल्याण, टिटवाळा, शहाड किंवा बदलापूर स्थानकांवर अवलंबून राहावे लागते.
मुंबई: अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण–मुरबाड रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महत्त्वाची प्रगती झाली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीच्या संपादन प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील 18 गावांमधील एकूण 151.44 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. प्रस्तावित रेल्वेमार्ग आंबिवली आणि टिटवाळा मार्गे कल्याण ते मुरबाड असा सुमारे 28 किलोमीटर लांबीचा असणार आहे.
मुरबाड तालुक्याला प्रथमच थेट रेल्वे जोडणी मिळणार असल्याने या प्रकल्पाकडे स्थानिक नागरिक मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याबरोबरच विकासालाही मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या रेल्वे प्रकल्पाची घोषणा 2016 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहभागातून प्रकल्प पुढे नेण्यात आला. आवश्यक प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक प्रक्रिया आणि निधीची तरतूद पूर्ण झाल्यानंतर आता भूसंपादनाचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे.
सध्या मुरबाड परिसरातील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी कल्याण, टिटवाळा, शहाड किंवा बदलापूर स्थानकांवर अवलंबून राहावे लागते. नवीन रेल्वेमार्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि व्यावसायिकांना थेट रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच औद्योगिक गुंतवणूक, गृहनिर्माण, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही या प्रकल्पामुळे गती मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी एकूण सुमारे 214 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून अंदाजे 836 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यातील भूसंपादनात कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील 18 गावांचा समावेश आहे. अधिसूचनेनुसार संबंधित जमीनमालकांना 30 दिवसांच्या आत हरकती किंवा सूचना लेखी स्वरूपात सादर करता येणार असून त्यानंतर सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून अंतिम भूसंपादन आणि मोबदला निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 04, 2026 12:28 PM IST
Railway Update: 28 किमीचा मास्टरप्लॅन, 2016 मध्ये घोषणा, अखेर कल्याण-मुरबाड रेल्वेबाबत महत्त्वाचं अपडेट
