India Playing 11 vs England 1st T20 : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना आज रिव्हरसाईड ग्राउंडवर रंगणार आहे. या सामन्याच्या नाणेफेकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून, चाहत्यांमध्ये 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला प्लेइंग-11 मध्ये पाहण्याची प्रचंड उत्सुकता आहे. आता चाहत्यांच्या या मागणीला माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनीही पाठिंबा दिला आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभवला संधी न देणाऱ्या आकाश चोप्रा यांनी आता सूर बदलला असून, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याला खेळवले पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
वैभव सूर्यवंशीला पाचही सामने खेळवा… – आकाश चोप्रा
आकाश चोप्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारताच्या संभाव्य प्लेइंग -11 वर चर्चा केली. ते म्हणाले की, “आता वैभव सूर्यवंशीला प्लेइंग-11 मध्ये खेळवावेच लागेल. त्याला कधी खेळवायचे, हा प्रश्न होता, पण मला वाटते की आता तीच योग्य वेळ आली आहे. त्याला या मालिकेतील पाचही सामने खेळायला हवेत, तुम्ही त्याला सलामीला पाठवून सुरुवात करा.”
चोप्रा यांनी पुढे सांगितले की, आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताचा पराभव झाला होता. आपण जरी जगज्जेते असलो आणि सलग ट्रॉफी जिंकल्या असल्या, तरी आयर्लंडसारख्या संघाकडून सलग दोन सामने हरणे ही धक्कादायक बाब आहे. या पराभवाने आपल्याला जागे केले असून, संघात बदल करणे आता गरजेचे झाले आहे.
संजू सॅमसनला प्लेइंग-11 मधून डच्चू
आकाश चोप्रा यांनी आपल्या संघात सलामीवीर म्हणून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांची निवड केली आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर ईशान किशनला स्थान दिले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या संभाव्य संघातून यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
पण, फलंदाजांच्या रोटेशन पॉलिसीबद्दल बोलताना ते म्हणाले की, टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिलेल्या खेळाडूला न खेळवणे थोडे अन्यायकारक ठरेल. केवळ दोन अपयशानंतर कोणाला बाहेर कसे करणार? त्यामुळे अभिषेक, सॅमसन आणि ईशान किशन यांना रोटेशन पॉलिसीनुसार खेळवावे. या तिघांनाही आधीच सांगावे की तुम्हा सर्वांना पाचही सामने खेळायला मिळणार नाहीत, कारण आपल्याला युवा वैभव सूर्यवंशीला संधी द्यायची आहे.
पहिल्या टी-20 सामन्यासाठी आकाश चोप्राची प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई
हे ही वाचा –
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला