उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, पक्षातील 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार लवकरच वेगळा गट तयार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मात्र यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने भाजपवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकाराला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. आता या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले?
शिवसेना आणि ऑपरेशन टायगर यामध्ये भाजपचा काय संबंध आला? भाजपच्या माणसाला त्याबद्दल कशाला विचारता? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्व भाजपला साथ देतात. साथ देणारे कोणी येत असतील तर त्यांचं स्वागत आहे.
भाजपचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला हे विचारलं नाही पाहिजे. भाजपाचं मागेपुढे काही नसतं जे आमच्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. त्यांची 2024 ची निवडणूक ही शेवटची होती, मग त्यांनी 2029 च्या निवडणुकीचं भविष्य का बघावं? असं यावेळी मुरलीधर मोहळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुण्यामध्ये पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यावर देखील यावेळी मोहळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महानगरपालिकेमध्ये जे आमचे लोक काम करतात, प्रशासन काम करते एकूण आजची परिस्थिती पाहता पावसाने ओढ दिली आहे . धरण साखळीमध्ये पाणी कमी आहे, त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेतला असेल, असं यावर मुलरीधर मोहळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. हे सर्व खासदार आता वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटात देखील घडामोडींना वेग आला आहे. उद्या शिवसेना ठाकरे गटाकडून खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर व्हिप देखील जारी करण्यात आला आहे.