1964 साली प्रदर्शित झालेल्या 'राजकुमार' या चित्रपटातील एका गाण्याची रंजक कहाणी आजही चर्चेत आहे. या चित्रपटातील 'दिलरुबा दिल पे तू ये सितम किए जा' हे गाणे सुरुवातीला लता मंगेशकर यांना गाण्यासाठी देण्यात आले होते. मात्र गाण्याचे बोल आणि त्यातील सेंसुअल भाव पाहून त्यांनी ते गाण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते.
यानंतर संगीतकार 'शंकर-जयकिशन' यांनी आशा भोसले यांच्याशी संपर्क साधला. आशा भोसले यांनी गाणे गाण्यास होकार दिला, मात्र त्यासाठी लता मंगेशकर यांच्या मानधनाच्या तब्बल पाचपट रक्कम मागितली. ही बाब शम्मी कपूर यांना सांगितल्यानंतर त्यांनी गाण्याचे बोल पाहून आशा भोसले यांची मागणी योग्य असल्याचे मान्य केले.
त्यानंतर हे गाणे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. के. शंकर दिग्दर्शित 'राजकुमार' या चित्रपटात शम्मी कपूर यांच्यासोबत साधना प्रमुख भूमिकेत होत्या.
सुमारे 75 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे 1.5 कोटी रुपयांची कमाई करत मोठे यश मिळवले. 1964 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याचा पाचवा क्रमांक होता.
चित्रपटातील 'आ जा आई बहार' हे गाणेही प्रचंड लोकप्रिय ठरले आणि लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजामुळे ते आजही रसिकांच्या स्मरणात आहे.




