आधी गंभीरला हकला अन् ‘त्याला’ आणा, टीम इंडियाचा वर्ल्डकप विनरने मनातलं सगळं बोलून टाकलं – Marathi News | S sreesanth criticizes india head coach gautam gambhir for team india test perfomance


भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची निवड झाल्यापासून टीममध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. अनेक दिग्गज खेळाडूंनी कसोटीमधून निवृत्त घेतली. जसे की रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन. नुकताच टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या कर्णधार सूर्यकुमारला आता टी-20 संघात जागा मिळालेली नाही. या अनेक मोठा बदलांमुळे गंभीर यांच्यावर सतत टीका होत आहे. अनेक दिग्गज खेळाडू गंभीर यांच्या निर्णयावर वेळोवेळी आक्षेप घेताना दिसतात. यातच आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत आपल्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

श्रीसंत गंभीरवर संतापला

श्रीसंतच्या मते, भारतीय संघाला सध्या गौतम गंभीरसारख्या नव्हे, तर महेंद्रसिंग धोनीसारख्या प्रशिक्षकाची गरज आहे. श्रीसंतच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. जुलै 2024 मध्ये राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. गंभीरच्या कार्यकाळात भारताने अनेक आयसीसी स्पर्धा जिंकल्या, परंतु काही घरच्या मालिकांमधील संघाची कामगिरी अपेक्षेनुसार नव्हती. टी-20 मध्ये संघ जरी उल्लेखनीय कामगिरी करत असला तरीही वनडे आणि कसोटीतील कामगिरी प्रभावी राहिलेली नाही.

लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत श्रीसंत म्हणाला की, “खेळाडूंना अशा व्यक्तीची गरज असते जो त्यांचा आदर करेल. अशा व्यक्तीची नाही जी त्यांच्या पाठीमागे वाईट बोलणार किंवा टेलिव्हिजनवर स्वतःची प्रशंसा करण्याचा प्रयत्न करतात”. मुलाखतीदरम्यान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांविरुद्ध घरच्या मैदानावर भारतीय संघ का संघर्ष करत आहे, असे विचारले असता, तो म्हणाला की, “प्रशिक्षक कोण होता?  त्या प्रशिक्षक आधी बदला. टीम इंडियाला प्रशिक्षकाची गरज नाही, तर मार्गदर्शकाची गरज आहे. लोक काहीही म्हणोत, धोनीची मानसिकता आणि त्याने आपल्या खेळाडूंमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास हीच संघाच्या यशाची खरी गुरुकिल्ली होती.”

प्रशिक्षकाच्या भूमिकेवर आपले मत व्यक्त करताना श्रीसंत म्हणाला की, “खेळाडूंचे योगदान सर्वात महत्त्वाचे होते. खेळाडू विश्वचषक जिंकतात, प्रशिक्षक नाही. खेळाडू मैदानावर घाम गाळतात, त्यामुळे श्रेय त्यांनाच मिळायला हवे. यावर्षीचा टी- वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघाचे उदाहरण देत तो म्हणाला, “जर संजूने चांगली कामगिरी केली नसती, जर सूर्यकुमार यादवने चांगले कर्णधारपद भूषवले नसते, किंवा योग्य वेळी गोलंदाजीत बदल केले नसते, तर आपण जिंकलो असतो का? मैदानावर प्रशिक्षक निर्णय घेत होता का?”

BCCI ने जुलै 2024 मध्ये गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. त्याच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात भारतीय संघाने अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकल्या. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर संघाने आशिया कप जिंकला. 2026 च्या सुरुवातीला भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपही जिंकला.

आयसीसी स्पर्धांमध्ये मोठे यश मिळवूनही, भारतीय संघासाठी घरच्या मैदानावरील काही मालिका निराशाजनक ठरल्या. गंभीरच्या कार्यकाळात भारताला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर मालिकांमध्ये पराभव पत्करावा लागला. या निकालांच्या आधारावर, श्रीसंतने संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भारतीय संघाला मार्गदर्शक म्हणून धोनीची निवड करण्याची मागणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *