केतन अग्रवाल, सिया गोयल, चेतन चौधरी, लोहगडImage Credit source: एजन्सी
Ketan Agarwal Lohgad Murder Case: देशाला हादरवणाऱ्या हायप्रोफाईल केतन अग्रवाल खून प्रकरणात एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत आहे. 18 जून रोजी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्याच्या कठड्यावरून ढकलले होते. खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर पोलिसांना त्यात लव्ह ट्रँगल सापडला आणि हा घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले. सियासह तिचा प्रियकर चेतनला अटक करण्यात आली आहे. दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. याप्रकरणात विविध अँगलने पोलीस तपास करत आहेत. त्यात सियाचे स्थळ सुचवणाऱ्या मामाची लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली.
मामाने पोलिसांना सांगितले काय?
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी नरेंद्र मित्तल यांची ही चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी माहिती दिली आहे. मित्तल हे केतनचे वडील विशाल अग्रवाल यांचे मामा आहेत. त्यांनीच सियाचं स्थळ केतन साठी सुचवलं होतं. सिया ही नरेंद्र मित्तल यांच्या मेहुण्याची मुलगी आहे. जानेवारी २०२६ मध्ये केतन आणि सिया याचं लग्न ठरवण्याच्या दृष्टीने चर्चेला सुरुवात झाली. त्यानुसार लग्न ही ठरलं, पुढे फेब्रुवारीमध्ये केतन आणि सियाचा साखरपुडा झाला. नोव्हेंबरमध्ये आलिशान लग्न सोहळा ही ठरला होता.
नरेंद्र मित्तल यांनी आपल्या जबाबात सांगितले की, या प्रकरणात आमची भूमिका केवळ दोन्ही कुटुंबांची ओळख करून देऊन विवाहासाठी त्यांची भेट घडवून आणण्यापुरतीच होती, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांनाही या प्रकारामुळे धक्का बसला आहे.
सिया आणि केतनविषयी सांगितले काय?
मित्तल यांनी दावा केला की, सिया असे काही करू शकते, अशी आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. सिया आणि केतन दोघेही सुसंस्कृत, नम्र आणि चांगल्या स्वभावाचे होते.तसेच, सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील संबंधांची आम्हाला कोणतीही माहिती नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, आम्ही सियाला लहानपणापासून ओळखतो. तिने असे काही केले असेल, याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता, असेही नरेंद्र मित्तल यांनी सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील
केतन अग्रवाल यांच्या आई-वडीलांनी हा खून खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचा उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याची विनंती केली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंजूरी दिली. तर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती दिली आहे. शुक्रवारी दुपारी फडणवीस यांचा फोन आला होता. त्यांनी केतनच्या कुटुंबियांच्या इच्छेबाबत सांगितले. विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची मुख्यमंत्र्यांनी विनंती केली होती, तिला होकार दिल्याची माहिती त्यांनी दिली.