Election Commission: मविआच्या 32 हरकती आणि ‘त्या’ इशाऱ्यानंतर निवडणूक आयोग उत्तर देणार; चोक्कलिंगम यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष


Election Commission: राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (SIR) पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आज (शुक्रवार) दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वरिष्ठ नेत्यांनी दोन दिवसांपूर्वीच चोक्कलिंगम यांची भेट घेऊन मतदार यादी प्रक्रियेवर गंभीर संशय व्यक्त केला होता. या भेटीत मविआने 32 हरकती आणि सूचनांचे निवेदन आयोगाला सादर केले होते. या राजकीय घडामोडींनंतर आयोगाने तातडीने ही पत्रकार परिषद बोलावल्याने, महाविकास आघाडीच्या प्रश्नांना आणि आरोपांना मुख्य निवडणूक अधिकारी काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Mahavikas Aghadi: मविआचा गंभीर आरोप

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार याद्यांच्या सखोल विशेष फेरतपासणी (SIR) सर्वेक्षणावर महाविकास आघाडीने तीव्र आक्षेप घेतला आहे. कागदपत्रे पूर्ण असतानाही अनेक पात्र मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. या प्रक्रियेमागे मोठा राजकीय डाव असून, निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नये. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्षपणे राबवावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Aaditya Thackeray: पश्चिम बंगालसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ देणार नाही

“आमचा एसआयआर (SIR) प्रक्रियेला विरोध नाही, पण ती पारदर्शक असावी. पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारच्या प्रक्रियेतून भाजपला राजकीय फायदा झाला होता, तशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ नये,” असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

Shashikant Shinde: बीएलओ (BLO) नियुक्त्यांमध्ये राजकीय दबाव असल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मतदार नोंदणी अधिकारी (BLO) यांच्या नियुक्त्यांवरून थेट बोट ठेवलं आहे. “भाजपकडे सध्या 52 हजारांहून अधिक बीएलओ असल्याचा दावा केला जात आहे, ज्यामुळे इतर पक्षांना समान संधी मिळत नाहीये. बीएलओ नियुक्त्यांमध्ये राजकीय दबाव आणि हस्तक्षेप पूर्णपणे थांबला पाहिजे. जाणीवपूर्वक मतदारांची नावे कमी केली गेली, तर लोकांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होईल,” अशी भीती शिंदे यांनी व्यक्त केली.

Mahavikas Aghadi: घाई नको, आयोगाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत

निवडणुकांना अजून तीन वर्षांचा अवधी शिल्लक असल्याचा दाखला देत, मविआच्या शिष्टमंडळाने या प्रक्रियेसाठी आयोगाने घाई करू नये आणि अधिक वेळ द्यावा, अशी भूमिका मांडली आहे. नव्या मतदारांचे प्रबोधन, मार्गदर्शन आणि पडताळणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने स्पष्ट आणि पारदर्शक मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जाहीर करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Election Commission: आजच्या पत्रकार परिषदेत काय होणार?

महाविकास आघाडीने उपस्थित केलेले 32 मुद्दे, बीएलओ नियुक्त्यांमधील कथित असमानता आणि मतदारांची नावे वगळली जात असल्याच्या आरोपांवर आज दुपारी 3 वाजता मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम सविस्तर स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे. एस. चोक्कलिंगम आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.   

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीने सगळे रेकॉर्ड्स मोडले; इतिहासात पहिल्यांदाच घडलं, ध्रुव राठीलाही ओव्हरटेक

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *