Goddess Kamakhya: देवी कामाख्याचे मासिक पाळीचे ‘ते’ 3 दिवस, जिथे नदीचं पाणीही होतं लाल! अंबुबाची यात्रेला सुरूवात, धार्मिक महत्त्व जाणून घ्या..


Goddess Kamakhya: देवी कामाख्या….एक अद्भूत शक्तिपीठ… देवीच्या मंदिरात 22 जूनपासून अंबुबाची यात्रेला सुरुवात झाली असून 26 जून रोजी हा उत्सव संपेल. या काळात, माता कामाख्या मंदिराचे दरवाजे तीन दिवस बंद राहतात. या काळात पूजा आणि दर्शन पूर्णपणे स्थगित केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, दरवर्षी अंबुबाची यात्रेदरम्यान देवी कामाख्याला 4 दिवस मासिक पाळी येते. हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. ही चार दिवसीय यात्रा भारत आणि परदेशातून मोठ्या संख्येने भाविकांना आकर्षित करते. शिवाय, जगभरातील तांत्रिक, साधू देखील अंबुबाची जत्रेला भेट देतात. देवी कामाख्याचे मासिक पाळीचे ‘ते’ 4 दिवस, इथल्या नदीचे पाणी लाल का होतं? जाणून घेऊया त्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व…

51 शक्तीपीठांपैकी एक…कामाख्या मंदिराचे रहस्य…(Goddess Kamakhya)

आसाममधील गुवाहाटी येथील नीलाचल पर्वतावर वसलेले कामाख्या देवी मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. इतर सर्व शक्तीपीठांमध्ये हे मंदिर अत्यंत विशेष मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, देवी सतीची योनी येथे पडली होती, म्हणूनच कामाख्या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. येथे केवळ योनीची पूजा केली जाते, जी नेहमी फुलांनी झाकलेली असते. कामाख्या मंदिरात देवीची योनी असल्यामुळे, देवी कामाख्याला वर्षातून एकदा मासिक पाळी येते, अशी मान्यता आहे. जी अंबुबाची उत्सव म्हणून साजरी केली जाते. असे म्हटले जाते की या दिवसांमध्ये ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी देखील लाल होते. अंबुबाचीला निसर्गाच्या सुपीकतेचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते.

देवीचे ‘अंगवस्त्र’ मिळवण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी…

देवी कामाख्याची जेव्हा यात्रा सुरू होते, तेव्हा मंदिराचे दरवाजे पूर्णपणे बंद केले जातात. देवीची योनी पूर्णपणे पांढऱ्या वस्त्राने झाकली जाते आणि मंदिर आतून लाल वस्त्राने किंवा साडीने सजवले जाते. चौथ्या दिवशी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात, तेव्हा ते पांढरे वस्त्र पूर्णपणे लाल होते आणि भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. या पवित्र वस्त्राला ‘अंगोडक’ आणि ‘अंगवस्त्र’ म्हटले जाते आणि ते घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त जमतात. हे वस्त्र अत्यंत शुभ मानले जाते. भाविकांचा असा विश्वास आहे की हे वस्त्र जवळ ठेवल्याने वाईट शक्ती नेहमी दूर राहतात.

विश्वातील सर्वात शुद्ध आणि तेजस्वी ऊर्जा…

असा विश्वास आहे की या तीन दिवसांत माता कामाख्याला मासिक पाळी येते. तंत्रशास्त्रानुसार, देवीची मासिक पाळीची अवस्था ही विश्वातील सर्वात शुद्ध आणि तेजस्वी ऊर्जा मानली जाते. या काळात नीलाचल पर्वतरांगांमध्ये शक्तीचा प्रवाह सर्वोच्च पातळीवर असतो. या काळात केलेल्या कोणत्याही साधनेमुळे अनेक पटींनी लाभ होतो. मासिक पाळी हे सृजनशील शक्ती, प्रजननक्षमता आणि निसर्गाच्या पुनर्जन्माचे प्रतीक मानले जाते. तंत्रशास्त्रानुसार, हा तो काळ आहे जेव्हा देवीची दिव्य शक्ती जागृत होते, म्हणूनच जगभरातील तांत्रिक, अघोरी आणि साधू या ठिकाणी भेट देतात.

हेही वाचा

Garud Puran: स्मशानातून परतताना मागे वळून का पाहत नाही? भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं..गरुडपुराणातील उल्लेख जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *