Eknath Shinde Operation Tiger : उद्धव ठाकरे यांच्या एकूण सहा खासदांनी बंड केल्याचे बोलले जात आहे. ही बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून हरतऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत हे दिल्लीमध्येच आहेत. ते बंडखोर खासदारांशी सातत्याने संपर्क करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सहा खासदारांपैकी दोन खासदार परत येण्याची ठाकरे गटाला आशा आहे. असे असतानाच आता सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री दिल्लीहून ठाण्यात परतले आहेत. ते ठाण्यात येत आल्यानंतर आता बंडखोर खासदार दिल्लीतून गायब झाले आहेत.
नेमकं काय घडतंय?
मिळालेल्या माहितीनुसार आता एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. ते ठाण्यात येण्यामागे एक विशेष कारण असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष हा ठाकरे गटाकडून येणाऱ्या आक्षेपांवर काम करणार आहे. बंडखोर खासदारांचा प्रवेश झाल्यावर भविष्यात कोणताही कायदेशीर पेच निर्माण होणार नाही, यासाठी अगोदर शिंदे गटाकडून काम केले जाणार आहे. त्यासाठी सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाजू तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षाकडून या सहा खासदारांच्या पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
सध्या खासदारांचा पक्षप्रवेश लांबणीवर
सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ठाकरे यांच्या खासदारांच्या प्रवेशावर कायदेशीर अभ्यास केला जाईल. त्यामुळेच तुर्तास या सहा खासदारांचा प्रवेश दोन ते तीन दिवस लाबंणीवर टाकण्यात आला आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत ऑपरेशन टायगर यशस्वीपणे राबवलं आहे. त्यात त्यांना यश आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.
खासदार दिल्लीतून गायब
आता पुढचे दोन ते तीन दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व 6 खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतून बाहेर हलवण्यात आले आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आता हे बंडखोर सहा खासदार नेमके कुठे आहेत, ते अद्याप समोर आलेले नाही.
पुढील दोन दिवस काहीही समोर आणले जाणार नाही
सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाकडून आता लगेच काहीही जाहीर केले जाणार नाही. कोणतेही पुरावे दिले जाणार नाहीत. शिवसेनेकडून वेट एंड वाॅचची भूमिका घेण्यात आली आहे. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पाऊले टाकली जाणार आहेत. पुढील २ दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणले जाणार नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.