सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. या ऑपरेशन टायगरचा उद्देश उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडणं आहे. उद्धव ठाकरे गटाकडे 9 खासदार आहेत. हे नऊ खासदार नाराज असून पक्षात अस्वस्थ असल्याची बाहेर चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर त्यांची नाराजी असल्याचं हे खासदार खासगीत बोलतात अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला चार खासदार ऑनलाइन हजर होते, असं सांगण्यात येतय. नऊ पैकी एका खासदाराने एकनाथ शिंदे शिवसेनेच्या केंद्रातल्या मंत्र्याची भेट घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटातला हा नाराज खासदारांचा गट तृणमुल काँग्रेस प्रमाणे स्वतंत्र गट स्थापन करणार अशा चर्चा सुरु झाल्या.
“उद्धव ठाकरे हे आपल्या खासदारांचं संरक्षण करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेण्यांमध्ये ते अपयशी ठरले आहेत. खासदारांच्या तक्रारी पाहता उद्धव ठाकरे यांची दखल घेत नाहीत. आदित्य ठाकरेंशी त्यांचा समन्वय नाही आणि एकंदरीत आपल्या मतदार संघाचे काय होणार या विवंचनेत ते आहेत” असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. “ऑपरेशन टायगर होत असेल तर खासदारांची भावना सुद्धा या ना त्या मार्गाने समोर येईल आपल्याला वाट पाहावी लागेल” असं दरेकर म्हणाले.
शपथा वगैरे हा बालिशपणा वाटतोय
“दोघांची दोन मतं दिसत आहेत, खासदार निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहेत. शपथा वगैरे हा बालिशपणा वाटतोय, त्यांच्यात समन्वय, ताळमेळ नाहीये. ठाकरे म्हणतात जायचंय तर जाऊ द्या पण राऊत वेगळं बोलतात” असं प्रवीण दरेकर म्हणाले. “संजय राऊत यांचा आत्मविश्वास टोकाला, ठाकरेंना वाटत असेल की येणारा काळ चांगला तर त्यांना शुभेच्छा” अशी उपरोधिक प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.
काँग्रेसचा आत्मविश्वास हरपला आहे
“काँग्रेसचा आत्मविश्वास हरपला आहे. नेत्यांमध्ये आत्मविश्वास उरला नाहीये. हर्षवर्धन सपकाळांऐवढे उत्तम प्रदेशाध्यक्ष आत्तापर्यंत काँग्रेसला मिळाले नसतील, ते राहतील यातच आमचा फायदा आहे. त्यांच्यावर कोणतीच कारवाई होणार नाही. काँग्रेसमुक्त राज्य अशी त्यांची भूमिका आहे” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.