Last Updated:
Mumbai Marathi Jain : ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद आता अधिकच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दादरमधील वादानंतर हे लोण आता थेट दक्षिण मुंबईत पोहोचले आहे.
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत मागील काही दिवसांपासून सुरू असलेला ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद आता अधिकच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दादरमधील वादानंतर हे लोण आता थेट दक्षिण मुंबईत पोहोचले आहे. दक्षिण मुंबईतील चर्नी रोड परिसरातील फूटपाथ आणि रस्त्यांवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर मध्यरात्री काळा रंग फासण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे गिरगाव आणि चर्नी रोड परिसरात वाद चिघळण्याची शक्यता आहे.
नेमका वाद काय आहे?
मागील काही दिवसांपासून मुंबईतील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला आणि फूटपाथवर रात्रीच्या वेळी पांढऱ्या पट्ट्या मारल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. जैन समुदायाकडून त्यांच्या धार्मिक चालीरीती किंवा अहिंसेच्या संकल्पनेचा (पायाखाली कीटक चिरडले जाऊ नयेत म्हणून) भाग म्हणून या पट्ट्या मारल्या जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, सार्वजनिक रस्त्यांचे अशा प्रकारे धार्मिक कारणांसाठी वर्गीकरण किंवा खाजगीकरण केले जाऊ शकत नाही, अशी भूमिका देखील व्यक्त केली जात आहे. शनिवारी, दादरमध्ये पांढरी पट्टी मारल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले. हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचे त्यांनी म्हटले.
चर्नी रोडला काय घडलं?
दक्षिण मुंबईतील चर्नी रोड परिसरातील फूटपाथवर अशाच प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. बेने डोसा रेस्टोरंट समोरील फुटपाथवर ही पांढरी पट्टी मारल्याचे दिसून आले. यावरून स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. ‘आम्ही गिरगावकर’ या स्थानिक संघटनेने या प्रकाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक गिरगावकरांनी एकत्र येत भर रस्त्यातील या पांढऱ्या पट्ट्यांवर रात्रीच्या सुमारास काळा रंग लावला असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत वाद वाढण्याची शक्यता
यापूर्वी दादर परिसरातही असाच प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक मराठी विरुद्ध जैन समाज असा छुपा संघर्ष पाहायला मिळाला होता. आता दक्षिण मुंबईत, विशेषतः गिरगाव-चर्नी रोडसारख्या मराठी बहुल भागात हा वाद पोहोचल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आता, या वादाचे पडसाद किती आणि कसे उमटणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Mumbai,Maharashtra
