Sangli Crime: सांगली शहरातील संजयनगर परिसरातील अभयनगर भागात येथे गुरुवारी सायंकाळी घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. चार ते पाच हल्लेखोरांनी घरात घुसून 13 वर्षीय वेदांत मारुती बंडगरची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेदांत बंडगर हा स्थानिक हमाल नेत्याचा नातू होता.
पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळीने बंडगर यांच्या घरात घुसून गोळीबार केला. या गोळीबारात वेदांत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे.
माथाडी कामगारांमधील जुन्या वादातून घटना घडली?
प्राथमिक तपासात माथाडी कामगारांमधील जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलाची घरात घुसून हत्या झाल्याने सांगली शहरात खळबळ उडाली असून या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आजोबांच्या डोळ्यासमोर नातवाचा मृत्यू
दरम्यान, साताऱ्यात कोयना नदीत आपल्या वयोवृध्द आजोबा सोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका 12 वर्षीय मुलगा बुडाल्याची घटना घडली. कराड तालुक्यातील सुपने गावात आजोबाच्या डोळ्यासमोर ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कोयना नदीत गेल्या सहा दिवसात तिसरी घटना असून चाैघांचा मृत्यू झाला आहे. सुपने-किरपे पुलाच्या दरम्यान वाहणाऱ्या कोयना नदीच्या पाण्याच्या पात्रात वरद शंकर कांबळे असे बुडालेल्या नातवाचे नाव आहे. आजोबा नदीकाठाला बसून होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने नातू पाण्यात बुडू लागला तेव्हा पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुलगा बुडत असल्याचे लक्षात आले. तेव्हा पुलावरील प्रवाशांनी मोठमोठ्याने आरडोओरडा केली. तेव्हा ही घटना आजोबांच्या लक्षात आली. मात्र, तोपर्यंत नातू बुडाला होता. सुपने गावचे पोलिस पाटील कमलेश कोळी यांनी नदीत स्वतः उडी घेत मुलाला शोधून काढले.
इतर महत्वाच्या बातम्या
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके