मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी आमदारांची महत्वाची बैठक पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार या बैठकीला हजर होते. मात्र, या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला त्यावरुन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि तटकरे यांच्या खंडाजंगी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता भुजबळ यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झालं?
राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरे यांनी आपल्यावर आणि प्रफुल पटेल या ज्येष्ठ नेत्यांवर आणि पक्षावर टीका होत असताना पक्षातील इतर कोणताही नेता किंवा नेतृत्व आमचे समर्थन करत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली. दादांच्या निधनानंतर आम्ही पक्ष वाढवत असताना आम्ही दोघेच टिकेचे धनी का? असा सवालही त्यांनी केला. सुनील तटकरे यांच्या या मुद्यावर छगन भुजबळांनी आक्षेप घेतला. जे झाले ते झाले ते सोडून द्या आता पुढे जाऊया असा सल्ला भुजबळ यांनी तटकरे यांना दिला. त्यावरुन दोघात खंडाजंगी झाल्याचे म्हटले जात आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर सांगितले की, ‘कोणताही वाद झालेला नाही. आमच्या राष्ट्रवादीची बैठक सुरू होती तेव्हा आम्हाला समितीच्या बैठकीसाठी देखील फोन येत होते. काहीतरी कारण असेल. काही खडाजंगी अजिबात झालेली नाही, आम्हाला या बैठकीसाठी सारखे फोन येत होते. त्यामुळे मी मुद्द्याचं पटकन बोला असं म्हणालो, कुठलाही वाद झाला नाही. कुठलाही एकला चलोचा नारा कोणीही दिलेला नाही. कुठेही फुटलेले नाही आमची शक्ती तशीच आहे. सगळ्या आमदारांना सांगितलं की आम्ही सगळे एक आहोत.’
10 जूनचा पक्षाचा स्थापना मेळावा कुठं घ्यायचा यावरून मतमतांतरं
राष्ट्रवादीच्या बैठकीत 10 जूनचा पक्षाचा स्थापना मेळावा कुठं घ्यायचा यावरून मतमतांतरं झाल्याचे पहायला मिळाले. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पुणे किंवा बारामतीत पक्षाचा स्थापना दिवस साजरा करावा ही भूमिका मांडली तर पक्षातील काही नेत्यांनी मुंबईत स्थापना दिवस कार्यक्रम आयोजन करावे भूमिका मांडली. बारामती किंवा पुण्यात एनसीपीची ताकद जास्त आहै, त्यात अजित दादा यांच्य निधनानंतर प्रथमच वर्धापन दिन बारामतीत व्हावा अशी भूमिका तटकरे यांनी मांडली. मात्र पक्षातील काही नेत्यांनी मत वेगळ मांडलं. मात्र आता सुनेत्रा पवार यांनी मेळाव्याबाबत अंतिम निर्णय घेण्याची भूमिका सर्व आमदारांनी घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.