सापाने दंश केल्यामुळे एका तरूणाचा मृत्यू झाला. त्यामुळे मेरठमधील कुटुंबावर शोककळा पसरली होती. पत्नीचे रडून वाईट हाल झाले, कुटुंबीयही धक्क्यातच होते. कारण त्या तरूणाच्या बेडवर अंथरूणात खरंच साप आढळला. मात्र, अवघ्या काही तासांनंतर झालेल्या पोलीस तपासात असं काही समोर आलं की या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळम मिळालं. त्या तरूणाचा मृत्यू ही दुर्घटना नसून अतिशय थंड डोक्यान प्लान रचून केलेला खून असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आधी त्या इसमाला दुधात मिसळून झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या आणि त्यानंतर, तो गाढ झोपेत असताना, त्याचा मृत्यू अपघाती वाटावा यासाठी अंथरुणाच्या चादरीखाली एक विषारी साप सोडण्यात आला असा आरोप करण्यात येत आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा कट दुसरा-तिसऱ्या व्यक्तीने नव्हे तर त्याच इसमाच्या पत्नीने रचल्याचे समोर आले. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.
मेरठच्या हस्तिनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकरणात पोलिसांनी पत्नी, तिचा कथित प्रियकर आणि इतर दोन व्यक्तींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंध आणि विम्याची 20 लाखांची रक्कम, हेच या हत्येमागचं प्रमुख उद्देश होते. या कटाची अंमलबजावणी गुरुवारी रात्रीच सुरू झाली होती, असंही पोलिसांनी सांगितलं. गुरूवारी रात्री मृत अतुल पनवार याला त्याची पत्नी दामिनीने त्री दूध दिले होते, मात्र त्यामध्ये अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या, असा आरोप आहे. त्यानंतर काही वेळातच अतुल गाढ झोपला. याच वेळेची आरोपी वाट पहात होते. अतुल आता गाढ झोपेत आहे, तो उठणार नाही, विरोधही करू शकणार नाही याची खात्री पटल्यावर आरोपींनी कटाच्या या स्टेपची अंमलबजावणी सुरू केली.
चादरीत सोडला साप
शाळेचा चालक तुषार (उर्फ निक्की) याने त्याचे दोन साथीदार, सोनू आणि उदय यांच्यासह या हत्येसाठी आधीच तयारी केली होती. त्यांनी सोबत एक विषारी साप आणला होता आणि तो अतुलच्या अंथरुणात, चादरीखाली सोडला, असा आरोप आहे. अतुल गाढ झोपेत असल्याने त्याला स्वतःचा बचाव करता आला नाही आणि सापाने त्याला दंश केला; त्याच्या विषामुळे अतुलचा मृत्यू झाला. सापच्या दंशामुळे त्याचा मृत्यू झाला, असं सकाळी सगळ्यांनावाटेल आणि कोणालाही संशय येणार नाही, अशी आरोपींची अपेक्षा होती.
पत्नीच हॉस्पिटलला घेऊन गेली
यानंतर शुक्रवारी सकाळी दामिनी आपल्या पतीसह हस्तिनापूर सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचली. आपल्या पतीला रात्री सापाने दंश केल्याचे तिने डॉक्टरांना सांगितलं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी अतुलला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता, त्यांना अंथरुणात एक सापही आढळून आला. आधी सगळं नॉर्मल वाटलं, पण काही गोष्टींनी पोलिसांचा संशय बळावला. मेरठ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळावरील अनेक गोष्टी नीट नव्हत्या. सापाचं वर्तन, तो बेडवर असणं आणि संपूर्ण घटनेचा वृत्तांत यांत विसंगती होती. त्यामुळे, या घटनेकडे केवळ एक अपघात म्हणून दुर्लक्ष करण्याऐवजी पोलिसांनी वैज्ञानिक आणि तांत्रिक पद्धतींचा वापर करून तपास सुरू केला. हा निर्णयच या प्रकरणातील एक निर्णायक वळण ठरला.
कॉल डिटेलने उघड झाला कट
पोलिसांनी सर्वप्रथम मृत व्यक्ती, अतुलची पत्नी दामिनी हिचा मोबाईल फोन आणि कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स (CDR) तपासले. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, ती तुषार ऊर्फ निक्की या शालेय वाहन चालकाच्या सतत संपर्कात होती. त्यांच्यातील वारंवार होणारे संभाषण आणि भेटीगाठींचे डिजिटल पुरावेही आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तुषारला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान तो माहिती वारंवार बदलत होता, आणि तोड्याच वेळात त्याने कट उघड केला. तपासादरम्यान पोलिसांना तुषारच्या मोबाईल फोनमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा सापडला: एका डब्यात असलेल्या सापाचा फोटो. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत तुषारने कबूल केले की त्याने हा विषारी साप दोन गारुड्यांकडून विकत घेतला होता. हाच फोटो या तपासातील सर्वात महत्त्वाचा डिजिटल पुरावा ठरला.
20 लाखांच्या विम्यामुळे घेतला जीव ?
दरम्यान पोलिसांच्या तपासात असेही निष्पन्न झाले की, अतुल पनवारच्या नावे सुमारे 20 लाख रुपयांची विमा पॉलिसी होती. पोलिसांचा असा दावा आहे की, अतुलच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम मिळवण्यासाठी दामिनी आणि तुषार यांनी कट रचला होता. या कटात सहभागी असलेल्या सोनू आणि उदय यांना या रकमेपैकी 5 लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दामिनी आणि तुषार, हे दोघे भविष्यात एकत्र राहण्याचाही विचार करत होते असा दावा केला जात आहे. एवढंच नव्हे तर अतुलचा जीव घेण्याचा हा काही पहिलाच प्रयत्न नव्हता; याआधी सुमारे 20 दिवसांपूर्वी तुषारने त्याला ‘अर्टिगा’ कारने धडक देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी अतुलने हेल्मेट घातलेले असल्याने त्याचा जीव वाचला, असंहीतपासात उघड झालं. तो हल्ला अयश्सवी झाल्यावर अखेर हा प्लान रचण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अतुल आणि दामिनी यांनी 2019 मध्ये प्रेमविवाह केला होता. ते दोघे मिळून हस्तिनापूरमधील रामलीला मैदानावर ‘कृष्ण किड्स पब्लिक स्कूल’ चालवत होते. कुटुंबीय आणि समाजाच्या चिंतांकडे दुर्लक्ष करून त्यांनी एकत्र संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दामिनीची जवळीक शाळेत चालक म्हणून काम करणाऱ्या तुषारसोबत वाढली आणि या संबंधांचे रूपांतर अखेरीस खुनात झालं, असं पोलिसांनी सांगितलं.