शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता’ मालिका अचानक का सोडली? निर्मात्यांसोबतचा मोठा वाद पुन्हा चर्चेत – Marathi News | Taarak mehta fame shailesh lodha dispute with tmkoc producer asit kumar modi what exactly happened between them


शैलेश लोढा, असित कुमार मोदीImage Credit source: Instagram

अभिनेते आणि कवी शैलेश लोढा यांना सर्वसामान्यपणे प्रेक्षक ‘तारक मेहता’ या नावानेच ओळखतात. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी अनेक वर्षे तारक मेहताची भूमिका साकारली होती. तब्बल 14 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर त्यांनी अचानक ही मालिका सोडली. ही मालिका सोडल्यानंतर त्यांनी निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. आता मुलगी स्वरा लोढाच्या लग्नानिमित्त हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामागचं कारण म्हणजे शैलेश लोढा यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला राजकारण, क्रीडा, अध्यात्म आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होते, मात्र या सर्वांच्या गर्दीत ‘तारक मेहता..’ मालिकेतील एकही कलाकार दिसला नाही. यावरून सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.

शैलेश लोढा यांनी 2022 मध्ये आलेल्या एका वाईट अनुभवानंतर ही मालिका सोडली होती. निर्माते असित कुमार मोदी यांच्यासोबत त्यांचा मोठा वाद झाला होता. या वादानंतर त्यांनी आत्मसन्मान राखत मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. या वादाचा खुलासा खुद्द शैलेश यांनी ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. शैलेश लोढा यांनी सांगितलं की, असित मोदींनी त्यांच्याशी चुकीची वागणूक केली होती. इतकंच नव्हे तर त्यांनी काही अपशब्दांचाही वापर केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

ते म्हणाले, “सब टीव्हीवर एक शो होता, गुडनाइट इंडिया. त्या शोमध्ये मला पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. मी तिथे कवी शैलेश लोढा म्हणून गेलो होतो. याबद्दल कोणताच आक्षेप नसायला पाहिजे होता. कारण कवी शैलेश लोढा ही माझी वैयक्तिक ओळख आहे, त्या ओळखीने मी कुठेही जाऊ शकतो. बरं तो शोसुद्धा त्याच वाहिनीवर प्रसारित होतो, जिथे आमची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. ज्यादिवशी माझा एपिसोड प्रसारित होणार होता, त्याच्या ठीक एक दिवस आधी निर्माते असित मोदींनी मला फोन केला. तू तिथे गेलाच कसा, असा प्रश्न त्यांनी मला विचारला.”

याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “मी तिथे कोणतीच भूमिका साकारायला गेलो नाही, फक्त सेलिब्रिटी गेस्ट म्हणून गेलो होतो, असं स्पष्टीकरण मी त्यांना दिलं. तो एपिसोडसुद्धा फक्त अर्ध्या तासाचा होता. मात्र त्यावेळी माझ्याशी बोलताना त्यांनी अत्यंत असभ्य भाषेचा वापर केला होता. मला ते सहन झालं नाही. पुन्हा एकदा अशाच असभ्य वागणुकीवरून आमचा वाद झाला होता. इथे सर्व काम करणारे माझे नोकर आहे, असं त्यांनी सेटवर म्हटलं होतं. त्यामुळे मी ती मालिका सोडली. मात्र त्यानंतरही मी सेटवर जाऊन काम करत होतो, जेणेकरून मालिकेचं काही नुकसान होऊ नये. तरीही असित मोदींनी माझे पैसे रोखले. मला त्रास देण्यासाठी ते असं करत होते. म्हणूनच मी सेटवरून अचानक निघालो. कारण त्यांनी काही महिन्यांचे पैसे मला परत दिले नव्हते.”

शैलेश लोढा यांनी थकीत मानधनप्रकरणी असित मोदी यांच्या विरोधात ट्रिब्युनल कोर्टात तक्रार दाखल केली होती. ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांनी माझं मानधन थकवलं, असा आरोप त्यांनी कोर्टात केला होता. हा खटला शैलेश लोढा यांनी जिंकला होता. मिळालेल्या माहितीनुसार, असित मोदींना सेटलमेंट म्हणून शैलेश यांना डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून 1 कोटी 5 लाख 84 हजार रुपये द्यावे लागले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *