Ladki Bahin Yojana: महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महिलावर्गाच्यादृष्टीने गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये कधी मिळणार, असा सवाल अनेकदा विचारला जातो. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Scheme) पैसे 1500 रुपयांवरुन 2100 करण्याचे सूतोवाच केले होते. यासंदर्भात आता केंद्रीय पातळीवर एक महत्त्वाची घडामोडी घडली आहे. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीणसारख्या योजनांच्या रकमेची वेळोवेळी समीक्षा करण्याची गरज आहे. महागाई वाढल्याने आणि कुटुंबांच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास ती रोख रक्कम वाढवली पाहिजे, असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने सादर केलेल्या (EAC PM) एका शोधनिबंधात हे सुचवण्यात आले आहे.
EAC PM ने सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण योजना’ आणि ओडिशातील ‘सुभद्रा योजनेचा’ अभ्यास करण्यात आला आहे. ‘या योजनांमुळे महिलांची बचत वाढली, घरगुती खर्चात मदत झाली आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली’ असे या अहवालात म्हटले आहे. रोख मदतीसोबत महिलांना डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि स्वयं सहायता गट यांच्याशीही जोडले जावे, जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतील, असेही अहवालात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात सरासरी शिल्लक 84 टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. महिलांच्या महिन्याच्या खर्चात वाढ झाली असून महाराष्ट्रात त्यात 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या खर्चात आरोग्य, शिक्षण आणि रोजच्या गरजांच्या अनुषंगाने खर्च होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. या योजनेचा फायदा सगळ्या कुटुंबाला झाला असून कुटुंबातील इतर सदस्यांची बचत वाढली आहे तर खर्च कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न करणे, निकषांची पूर्तता न करणे आणि अर्जातील त्रुटी ही यामागील प्रमुख कारणे आहे. अपात्र ठरलेल्या महिलांचे या योजनेंतर्गत मिळणारे 1500 रुपये बंद झाले आहेत. राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेतून वगळलेलं नाही. डेटाबेसनुसार आणि निकषात न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
आणखी वाचा