उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं


परभणी : शिवसेना उबाठा (Shivsena) पक्षातील फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) खासदार बंडू जाधव यांच्यासह सर्वच सहा मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेतली. यावेळी, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे हेही समवेत होते. संजय राऊत यांनी सर्वच खासदारांवर जोरदार प्रहार केला, तर उद्धव ठाकरेंनी देखील गद्दार म्हणत फुटीर खासदारांवर निशाणा साधला. मात्र, ठाकरेंची साथ सोडल्यानंतर संजय दिना पाटील वगळता इतर खासदारांनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका करणे टाळले. तर, परभणीचे खासदार बंडू जाधव आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जाण्याने अनेकांना आश्चर्य वाटले. आता बंडू जाधव (sanjay jadhav) यांनी पहिल्यांदाच ठाकरेंची साथ सोडण्याचे कारण सांगितलं. 

आम्ही बघत होतो आमच्या डोळ्यासमोर एक एक जण पक्षातून जात होता, शिवसेनेचे विभाजन झालं, तेव्हा मी स्वतः उद्धव साहेबांना बोललो की, साहेब तुमची तब्येत बरी नसते, तुम्हाला जमत नाही पण आदित्य ठाकरे यांना तरी किमान महाराष्ट्रात फिरवा. संघटनेमधील लोकांना भेटू द्या, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊ द्या मात्र ते काही फिरले नाहीत. संघटनेकडे ठाकरेंनी दुर्लक्ष केल्यामुळेच आज सर्वजण त्यांना सोडून जात आहेत, गेले आहेत, अशा शब्दात परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी पहिल्यांदाच ठाकरेंची साथ सोडण्यावरुन भाष्य केलं. 

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेना सोडून जाण्याचे कारण जाहीर भाषणातून सांगितले. एवढेच नाही तर आम्हालाही जड अंत:करणातून का होईना पण निर्णय घ्यावा लागला. कारण, बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेला शिवसेना नावाचा वटवृक्ष हा आम्हाला अबाधित ठेवून पुढे न्यायचा आहे. त्यामुळेच, आम्ही हा निर्णय घेतला असल्याची खंतही संजय जाधव यांनी व्यक्त केली. परभणी जिल्ह्याच्या सेलू येथे आयोजित एका सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, खासदार बंडू जाधव हे वारकरी संप्रदायातील असून दरवर्षी ते न चुकता आळंदी ते पंढरी अशी पायी वारी करतात. यंदाही ते पंढरीच्या वारीसाठी पायी जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्या आठवड्यात मोठं बंड झाल्याचं पाहायला मिळालं, ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेंच्या शिवसेनेत 6 विद्यमान खासदारांनी प्रवेश केला. आपला स्वतंत्र गट स्थापन करत, त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर, काही खासदारांनी सत्तेचं कारण देत, विकासनिधीचं कारण देत पक्ष सोडत असल्याचं सांगितलं. तर, संजय जाधव यांनीही आता आपलं राजकारण सांगितलं आहे. 

हेही वाचा

शाळा परिसरात ‘स्टिंग’ बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *