पुण्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला होता. डोंगरावरून पाय घसरून पडल्याने अपघाती मृत्यूची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र संशयानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून या घटनेचा कट रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. सध्या दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. असातच आता सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सिया सासरच्या लोकांवर खूश होती…
सिया गोयलच्या वडिलांनी म्हटले की, ‘ही दुख:द घटना आहे. आमचा विश्वास बसत नाही. आम्ही केतनला आमचा मुलगा मानायचो. त्यांना आम्ही गमावलंय याचं दुख आहे. आम्हाला लग्नाच्या खूप अपेक्षा होत्या. काय काय स्वप्न सजवले होते. सियाचा वाढदिवस होता. आम्हाला महाबळेश्वरला जाऊन सेलिब्रेशन करायचं होतं. उदयपूरला लग्न करायचं होतं. बरीच स्वप्न होते. सियाही लग्नाबाबत भरभरून बोलायची. सासरच्या लोकांवर खूश होती. चांगला नवरा आणि घर मिळाल्याचं सांगत होती.’
आम्हाला अफेअरबद्दल माहिती असती तर…
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सियाचं अफेयर असतं तर तिने सांगितलं असतं. तिने थोडं जरी सांगितलं असतं किंवा केतनच्या कुटुंबीयांनी सांगितलं असतं तर आम्ही तिच्याशी बोललो असतो. काही जरी कळलं असतं तर आम्ही बोललो असतो.सिया सिंपल होती. तिचं काही अफेयर होतं असं काही माहीत नव्हतं. जरा जरी माहीत असतं तर सियाला आम्ही दरडावलं असत. चेतन कुठून आला माहीत नाही. त्याला कधी भेटलो नाही. त्याचा चेहराही कधी पाहिला नाही. तो कधी घरी आला नाही, आम्ही कधी त्याचं नावही ऐकलं नाही. आम्ही केतनला गमावलं नाही. तर मुलालाच गमावलं आहे.’
नोव्हेंबरमध्ये होणार होते लग्न
केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. यासाठीच्या तयारीलाही सुरुवात करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच सिया आणि चेतनने केतनचा कट रचून खून केल्याचे समोर आले आहे. आता पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.