पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. हा विस्तार नेमका कधी होणार? त्यात कोणाला प्राधान्य मिळणार? या बद्दल जाणून घ्या. सूत्रांच्या माहितीनुसार संसदेचं पावसाळी अधिवेशन संपण्याआधी मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचं लक्ष्य आहे. काही वरिष्ठ मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो. नजीक भविष्यात ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांना मंत्रिमंडळ विस्तारात जास्त प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा आहे. पंजाबमध्ये पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला विधानसभा निवडणूक आहे. त्यांना तसचं 2027 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा विधानसभा निवडणुका आहेत, त्या राज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात जास्त प्राधान्य मिळेल.
भाजपकडून राष्ट्रीय स्तरावर एका नव्या टीमची लवकरच घोषणा होणार आहे. भाजपच्या या संघटनात्मक फेररचनेनंतरच मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होईल. कारण मंत्रिमंडळातील काही जण पक्ष संघटनेत गेल्या रिक्त झालेल्या जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपंकडून संघटनात्मक आणि सरकारमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक संतुलन राखण्याचा प्रयत्न होईल. महिला, दलित, शीख समाज आणि अन्य मागास घटकांना सरकार आणि पक्ष संघटनेत पुरेपूर प्रतिनिधीत्व देण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून आधी राष्ट्रीय संघटनात्मक टीमची घोषणा होईल. त्यानंतर नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होईल. आगामी राज्यातील विधानसभा आणि तीन वर्षांनी होणारी 2029 लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच हे सर्व बदल होणार आहेत. महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन मंत्रिपद मिळतील अशी चर्चा आहे. सध्या भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये तेलगु देसम पार्टी नंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठा पक्ष आहे. उद्धव ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी प्रवेश केल्यामुळे एकनाथ शिंदे यांची केंद्रातील ताकद वाढली आहे. त्यांचे एकूण 13 खासदार झाले आहेत. महाराष्ट्रातून कोणाला मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार, याची उत्सुक्ता आहे.